बीडच्या रुग्णाला मुंबईत मिळालं नवजीवन; जसलोक हॉस्पिटलची जटिल स्पाइन सर्जरी ठरली जीवनदायी




१५ दिवस अनिश्चिततेत गेलेल्या रुग्णाला ‘एका हलक्या हालचालीने’ दिली आशा; जसलोकच्या तज्ज्ञ उपचारांनी पुन्हा चालता झाला 


बीड / मुंबई, २२ मार्च २०२६: बीड जिल्ह्यातील श्री. राजीव वरवडे यांच्यासाठी एका भीषण अपघातानंतर जीवन जणू थांबलं होतं. मानेच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला अर्धांगवायू झाला होता. मात्र, मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे करण्यात आलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या स्पाइन सर्जरीमुळे त्यांना नवजीवन मिळालं असून, आज ते स्वतःच्या पायावर चालत आहेत.

श्री. वरवडे हे कामावरून घरी परतत असताना झालेल्या अपघातात त्यांच्या मानेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले. या दुखापतीमुळे पाठीच्या कण्यावर प्रचंड दबाव आला आणि त्यांच्या खांद्याखालचा संपूर्ण भाग निकामी झाला. स्थानिक पातळीवर अनेक रुग्णालयांनी ही दुखापत अत्यंत गंभीर असल्याचे सांगत उपचार करण्यास नकार दिला. पुढील १५ दिवस ते कोणत्याही ठोस उपचारांशिवाय घरीच होते, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाला.

या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलशी संपर्क साधला. तेथे कन्सल्टंट स्पाइन सर्जन डॉ. मनिष कोठारी यांनी व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे तपासणी केली. या तपासणीत शरीर पूर्णतः निष्क्रिय असतानाही डाव्या पायाच्या अंगठ्यात झालेली अतिशय सूक्ष्म हालचाल त्यांनी ओळखली. हीच एक आशेची किरण ठरली.

यानंतर श्री. वरवडे यांना तातडीने मुंबईत दाखल करण्यात आले. उपचारांमधील विलंबामुळे शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची होतीरुग्णाला आयुष्यभर व्हेंटिलेटरवर राहावे लागू शकते, अशी शक्यता होती. तरीही, कुटुंबियांनी धाडसाने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

डॉ. कोठारी आणि त्यांच्या टीमने सर्व्हायकल स्पाइन सर्जरी करून पाठीच्या कण्यावरील दबाव कमी केला आणि मणक्याला स्थिरता दिली. शस्त्रक्रियेनंतर सकारात्मक बदल दिसू लागले. अवघ्या दोन आठवड्यांत श्री. वरवडे आधाराने चालू लागले आणि तीन महिन्यांत ते पूर्णपणे स्वतः चालण्यास सक्षम झाले.

डॉ. मनिष कोठारी म्हणाले, “या केसमध्ये सर्वात मोठे आव्हान म्हणजे शस्त्रक्रिया यशस्वी झाली तरी रुग्ण व्हेंटिलेटरवर अवलंबून राहण्याची शक्यता होती. मात्र, आम्ही त्यांना स्वतंत्रपणे श्वास घेता यावा आणि सामान्य आयुष्य जगता यावे, यावर लक्ष केंद्रित केले.”

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके यांनी सांगितले, “बीडसारख्या भागातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची गरज असते. अशा वेळी टर्शियरी केअर सेंटर्सनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारणे महत्त्वाचे असते. ही केस आमच्या बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाचे उदाहरण आहे.”

स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलताना श्री. राजीव वरवडे म्हणाले, “अपघातानंतर सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं. पण जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाले आणि आज मी पुन्हा चालू शकतोयहे माझ्यासाठी नवजीवनच आहे.”

ही केस केवळ एका रुग्णाच्या पुनर्जन्माची कहाणी नसून, बीडसारख्या जिल्ह्यातील रुग्णांनी योग्य वेळी तज्ज्ञ उपचार मिळविल्यास अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही आशा निर्माण होऊ शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. 

Post a Comment

0 Comments