अखिल भारतीय विधी परीक्षेत अॅड. शंकर चव्हाण यशस्वी – कायद्याच्या माध्यमातून समाजसेवेची दिशा!
बीड – "कायदा हे केवळ व्यावसायिक क्षेत्र नसून, तो सामाजिक परिवर्तनाचं शक्तिशाली माध्यम आहे", शिस्तबद्ध अभ्यास, सामाजिक भान आणि कायद्यावरील निष्ठा या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवणारे, समाजसेवा हीच खरी भक्ती या तत्त्वाने जीवन घडवणारे व सामाजिक परिवर्तनासाठी झपाटून काम करणारे अॅड. शंकर चव्हाण यांनी अखिल भारतीय विधी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. कायद्याच्या माध्यमातून न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांना बळकटी देण्याच्या त्यांच्या संकल्पात हे यश महत्त्वाची भर घालणारे ठरले आहे.
अखिल भारतीय विधी परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी कायदा क्षेत्रातील प्रवेश अधिक सशक्त केला आहे. बॉम्बे हायकोर्ट, मुंबई येथे ते विविध प्रकरणांवर काम करत असून, गरजू, वंचित आणि सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. कायद्याच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवणं हे त्यांचं मुख्य ध्येय आहे.
त्यांचे शिक्षण एमबीए आणि नंतर लातूर येथील दयानंद विधी महाविद्यालय येथून बी.ए., एलएल.बी., पदवी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी सरकारी सेवेत प्रवेश केला आणि अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम केलं. मात्र, सामाजिक क्षेत्रात अधिक मोठ्या पातळीवर काम करण्याच्या ध्येयाने त्यांनी स्वेच्छेने सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. हा निर्णयच त्यांच्या धाडसी आणि सेवाभावी वृत्तीचं प्रतीक आहे.
फक्त कायदेशीर मार्गच नव्हे, तर लोकप्रतिनिधी म्हणूनही समाजाच्या हितासाठी काम करावं या विचाराने अॅड. शंकर चव्हाण यांनी २०२४ मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी परळी विधानसभेच्या मतदारसंघातून उमेदवारीसाठी अधिकृत अर्ज सादर केला. स्व-इच्छेने शासकीय सेवेला रामराम ठोकून त्यांनी पूर्णवेळ सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे.
अखिल भारतीय विधी परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी कायदेतज्ज्ञ म्हणून पात्रता मिळवली असून, आता ते विविध सामाजिक, न्यायिक, आणि कायदेशीर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास सज्ज आहेत. ते म्हणतात, "लोकशाही बळकट करायची असेल, तर न्याय आणि समतेसाठी सजगपणे काम करणं आवश्यक आहे. कायदा आणि लोकशाही या दोन्हींच्या माध्यमातून मी समाजात सकारात्मक बदल घडवू इच्छितो."
सरकारी सेवक ते कायदेतज्ज्ञ आणि आता लोकप्रतिनिधी होण्याच्या वाटेवर असलेले अॅड. शंकर चव्हाण यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. त्यांचं अखिल भारतीय विधी परीक्षेतील यश, स्वेच्छानिवृत्ती, आणि निवडणूक उमेदवारी या तिन्ही बाबी समाजसेवेसाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांची साक्ष देतात. या यशानंतर ते कायदेशीर सेवांमध्ये अधिक सक्रीय होणार असून, गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहेत. समाजात जागरूकता निर्माण करणं, युवकांना प्रेरणा देणं आणि शासकीय पातळीवर पारदर्शक कार्यपद्धती रुजवणं हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.


0 Comments