करिअर मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या पाल्यांना इयत्ता अकरावी मध्ये आर्ट्स (कला), सायन्स (विज्ञान) का कॉमर्स (वाणिज्य) वा एखाद्या शाॅर्ट टर्म डिप्लोमा वा कोर्सला प्रवेश द्यावा या चिंतेत पालक असतात. त्यांनी आपल्या मुलांतील सुप्त गुणांचा व त्यांच्यातील क्षमतांचा विचार केला पाहिजे, स्वतःची क्षमता ओळखणारा विद्यार्थीच यशस्वी करिअर घडवू शकतो. त्यामुळे करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी मुलां-मुलींनी स्वतःला ओळखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक तथा विश्वविक्रमवीर प्रशिक्षक प्रा.सर नागेश जोंधळे यांनी शुक्रवार, दि. ३१ मे २०२४ रोजी खोलेश्वर विद्यालय, दिंद्रुड, ता.माजलगाव, (जि.बीड) येथे आयोजित दहावी नंतर पुढे काय ? या विषयावर बोलताना केले. करिअर मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाप्रमुख दिलीप पारेकर, प्राचार्या सरीता फपाळ, आई सेंटर प्रो चे संस्थापक प्रा.नागेश जोंधळे, कॉर्पोरेट मॅनेजर अल्पा पांडे, प्रा.अविनाश निर्मळ, प्रशिक्षक प्रतिक गौतम यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लीडरशिप ट्रेनर तथा करिअर क्षेत्रातील प्रख्यात तज्ज्ञ प्रा.नागेश जोंधळे यांनी इयत्ता दहावी / बारावी नंतर पुढे काय ? या विषयावर विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या समोर शिक्षणाचे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. दहावी, बारावी नंतर पुढे नेमके काय करावे ? कोणताही विषय निवडत असताना मुलांना त्यामध्ये असलेली रूची, त्यांच्यातील सुप्त गुणांची व भविष्यात त्या क्षेत्रातील उपलब्ध होणाऱ्या नोकरी किंवा व्यवसायाच्या संधीचे सांगडे घालून योग्य असे करिअर निवडणे महत्त्वाचे झाल्यामुळे अशा करिअर मार्गदर्शन शिबिरांची नितांत आवश्यकता असून यामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या पालकांचा व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग हा ही तितकाच महत्त्वाचा असतो. तसेच या शिबिरात विद्यार्थी व पालकांच्या आवडी-निवडी, मनात उडालेला गोंधळ, यानुसार प्रा.जोंधळे यांनी त्यांनी विचारलेल्या अभियांत्रिकी शाखेकडे अधिक कल असणाऱ्या प्रश्नांचे सखोल असे उत्तर देत आजघडीला सर्वोच्च अशा बी.टेक. इंजिनिअरिंग म्हणजेच बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग करण्यासाठी बारावी मध्ये सायन्स स्ट्रीम मधून शिक्षण घेताना फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स हे विषय असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, साॅफ्टवेअर इंजिनिअरिंग याप्रमाणेच सध्या इंजिनिअरिंगच्या अजून काही ब्रॅंचेसला प्रचंड महत्त्व प्राप्त होताना दिसत आहे. ते ब्रॅंचेस म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, न्युक्लिअर इंजिनिअरिंग, एरोस्पेस इंजिनिअरिंग, ॲरोनॉटिकल इंजिनिअरिंग या टाॅपच्या ब्रॅंचेस कडेही विद्यार्थ्यांचा कल सध्या वाढतच चालला असल्याचे चित्र आहे. या शाखेतील शिक्षण आणि करिअर कसं करणार याबाबत विस्तृत माहिती देताना सर्वप्रथम इंजिनिअरिंगची एंट्रान्स एक्झाम देणं आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. यामध्ये विशेषतः जेईई मेन्स, जेईई ऍडव्हान्स, बिटसॅट, एसआरएम जेईई, व्हिआयटी ईईई, एईईई, व्हिटीयु ईईई, गेट यापैकी कोणतीही प्रवेश परीक्षा पास करणं महत्त्वाचं असून आपल्याला मिळालेल्या स्कोर वरून तुम्हाला देशपातळीवर आय.आय.टी. व एन.आय.टी. तसेच राज्यातील आवडीचे कॉलेज मध्ये प्रवेशास पात्र होता येत असल्याचे सांगितले. पदवी स्तरांवर ॲरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम करण्यासाठी त्या विद्यार्थ्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात किमान ५० ते ६० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी लागते हे सांगतानाच झटकन पदवी आणि पटकन शासकीय वा निमशासकीय नौकरी मिळण्याची संधी देखील आहे. वरील सर्व इंजिनिअरिंग शाखेचे महत्व भारतातील तसेच जगातील शिर्षस्थानी असलेल्या नामांकित शासकीय, निमशासकीय, राष्ट्रीय तसेच मायक्रोसॉफ्ट, ऍप्पल, गुगल, फेसबुक, ॲमेझॉन, एक्सेंचर इत्यादी बहुराष्ट्रीय कंपन्यात उपलब्ध असणाऱ्या संधी, पद व पॅकेजेसचे ही माहिती आकर्षक पाॅवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून प्रा.नागेश जोंधळे यांनी आपल्या विशिष्ट अशा द डायनॅमिक कम्युनिकेटर या सुपरिचित शैलीत सादर केले. वाणिज्य व कला शाखेतील करिअर विषयी विविध प्रश्नांचे ही उत्तरे देताना विविध स्पर्धा परीक्षेचा तयारी करण्याकरिता अकरावी पासूनचा काळ हा किती महत्त्वपूर्ण असू शकतो व त्याचा पुरेपूर उपयोग आपण कसा करू शकता याचेही प्रात्यक्षिकरीत्या त्यांनी उदाहरणे दिली. प्रा.जोंधळे यांनी तरूणांना शिक्षण घेत असताना उत्तम गुणांबरोबरच एक चांगला व्यक्ती घडण्यासाठी तसेच आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणे महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना तसेच पालकांना त्यांच्या पुढील यशस्वी करिअर करिता मंगल कामना देण्यात आल्या व आई सेंटर प्रो च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःतील कौशल्य ओळखण्यासाठी करिअर टेस्टच्या साह्याने त्यांना करिअर निवडण्यासाठी परिपूर्णपणे मदत करण्याचे आश्वासन ही दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वानंद फपाळ यांनी केले. सूत्रसंचालन के.दत्ता यांनी केले तर उपस्थितांचे आभार औंदुबर ढोले यांनी मानले.


0 Comments